लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Monday 19 August 2019

माझा स्वाभिमान... भारतीय संविधान!!!

हा एकच ग्रंथ आहे जो भारताला एकसंघ आणि मजबूत ठेवू शकेल. 



संविधान नाही तर भारतवर्ष नाही
संविधान नाही तर लोकशाही नाही
संविधान नाही तर न्याय नाही
संविधान नाही तर समता नाही
संविधान नाही तर समभाव नाही
संविधान नाही तर देशप्रेम नाही
संविधान नाही तर स्वराज्य नाही
संविधान नाही तर मूलभूत हक्‍क नाही
संविधान नाही तर प्रगती नाही
संविधान नाही तर राष्ट्रीय सुरक्षा नाही
संविधान नाही तर राष्ट्रीय एकता नाही
संविधान नाही तर शिक्षण नाही
संविधान नाही तर सामाजिक, आर्थिक राजकीय प्रगती नाही
संविधान नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही
संविधान नाही तर देशांतर्गत शांतता नाही
संविधान नाही तर सामान्य जनतेला अधिकार नाही
संविधान नाही तर लोकशाही,लोकराज्य,समता, स्वातंत्र्य, न्याय,एकात्मता,बंधुता, माणुसकी आणि देशही...असं काहीच राहणार नाही.

म्हणून संविधानाला धोका असणाऱ्या शक्तींना वेळीच आवरा. संविधान वाचवा आणि सुरक्षित व सुशिक्षित हाती द्या.

#माझा_स्वाभिमान_भारतीय_संविधान
#लोकशाहीचा_विजय_असो
#जय_संविधान



Sunday 11 August 2019

महापुरातला प्रवास...मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!

महापुरातला प्रवास...मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!


पावसाळा आला, पाऊस सुरू झाला
मेघ गरजले, वीजा कडाडल्या
आधी मुंबईची तुंबई झाली
लाईफ लाईन सगळी पाण्याखाली गेली
मुंबईचा प्रथम नागरिक म्हणाला पूर आलाच नाही
कारण त्याचा मुलगा गटारात पडून हरवला नाही...

लोक ढिगाऱ्याखाली दबून मेले, कुणी मॅनहोल मध्ये गडप झाले
भर पावसातही अश्रू अनावर झाले, सरकार मात्र झोपेतच राहिले
कोल्हापूरची महालक्ष्मी मी 14 तास पुरात अडकली
प्रशासनाला  मात्र उशिराने जाग आली
स्थानिकांनी माणुसकी दाखवली म्हणून एक्सप्रेस पुरातून सुटली...

दरवर्षी मुंबापुरीची तुंबापुरी होते, पण जनता याला फक्त नैसर्गिक आपत्तीच समजते
मग मुंबईकरांचा तथाकथित मुंबई स्पिरीट जागा होतो, 
अन् सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाकडे तो सहज कानाडोळा करतो 
मुंबईकरांच्या ह्याच भोळेपणाचा फायदा सत्ताधारी घेतो
म्हणूनच काहीही झालं तरी पुन्हा तोच निवडून येतो...

मुंबईकरांना असले अंध स्पिरीट महाग पडणार आहे,
नेत्यांना काही फरक नाही, ते त्यांच्या महालात सुरक्षित राहणार आहे
दररोज मरणयातना सहन करत मुंबईकर पुन्हा उभा राहणार आहे
आमची मुंबई - आमची मुंबई करत तो स्वतः मात्र मुंबईतूनच हद्दपार होणार आहे
कारण तो त्याच लोकांना निवडून देणार आहे,
जे अनेक वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना गृहितच धरणार आहे...

असो... यंदाही मुंबईने कसाबसा पावसाळा सहन केला
पण अर्धा महाराष्ट्र मात्र महापुराने वेढला गेला.
कोकण, रायगड,सातारा, सांगली, कोल्हापूर.. सगळीकडे पूरच पूर...

अनेक जीव जात होते, संसार उध्वस्त होत होते 
आपले मुख्यमंत्री महोदय मात्र महाजनादेश यात्रा करत होते
जलसंपदा मंत्री पूर पर्यटन करत होते, सेल्फी काढत होते
महापुराचा आढावा सोडा ते तर नौकाविहार करत होते...

पूर परिस्थिती हाताबाहेर गेली, मग राज्याच्या राजाला जाग आली
राजाने हवेतूनच पूर बघितला, त्याच्या पायाला पाण्याचा साधा स्पर्शही नाही झाला
देशातल्या प्रत्येक राज्याच्या मदतीला माझा महाराष्ट्र धावून गेला,
पण आज शेजारचा कर्नाटकही आपल्या मदतीसाठी उदासिन झाला
महाराष्ट्र जणू पोरकाच झाला 
केंद्र आणि राज्य दोघांसाठी परका झाला....

राज्यात आलेला महापूर सत्ताधार्यांसाठी प्रचाराचा नवा मार्ग ठरला
मोफत गहू - तांदूळ देऊन त्यावर पक्षाचा शिक्का मात्र मारला.
पुरात मरण पावलेल्या आई - बाळाच्या मृतदेहासमोर माध्यमांना प्रतिक्रिया देणारे असंवेदनशील नेतेही दिसले,
पूरग्रस्तांच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून हसणारे खलनायकही दिसले....

अंध-अपंग,बहिऱ्या सरकारला माध्यमांनी अखेर जागे केले.
कर्तव्य बजावताना सांगलीच्या कुलदीप मानेला अश्रू मात्र अनावर झाले
अर्धा महाराष्ट्र बुडत होता, रडत होता, मरत होता आणि पंतप्रधान मात्र 370 च्या नावाखाली देशाला संबोधन करत होता.
सगळीकडे अंधार, निराशा आणि उध्वस्त झालेला संसार...
असा माझा महाराष्ट्र संघर्ष करत होता... 
जाती-पाती भांडण-तंटे सर्व काही सोडून एकत्र येण्याचे आवाहन करत होता...

अशात एक "माणूस" नावाचा नायक मदतीला धावून आला
माणसाचं शरीर असलेल्या त्या नायकातून जणू देवच बाहेर आला.
माणुसकीचं शस्त्र काढून त्या नायकाने केला संकटांवर प्रहार
पूरग्रस्तांना झाला जणू देवाचाच साक्षात्कार...

मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, गिरिजाघर सगळेच देव बुडले होते
पण वर्दीतले देव मात्र सर्वांनाच वाचवत होते.
माणुसकी या एकाच धर्माचे ते सर्व देव होते
कारण ते भारतीय जवान होते.
माणूस असो वा प्राणी सर्वांनाच ते वाचवत होते, 
स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटाशी ते लढत होते....

जवानाच्या पाया पडणारी बोटीवरची ती स्त्री असो,
जवानांचे औक्षण करणारी माता असो,
व्हीलचेअरवरची अपंग आजी असो, 
हृदयरुग्ण असलेले आजोबा असो,
बोटीवरचे ते हसणारे बाळ असो,
आठ महिन्यांची गरोदर महिला असो,
माकड असो, कुत्रा असो, गाय, म्हैस किंवा मांजर असो
या सर्वांनाच जीवनदान देणारे लोक माणुसकीचे खरे दूत होते
कारण, ते भारतीय जवान होते....

या महापुरात एक गोष्ट मात्र चांगली झाली,
जात-पात ही जणू पुरात वाहूनच गेली.
माणुसकीचा पुन्हा नवजन्म झाला,
माझा महाराष्ट्र खूप दिवसांनी पुन्हा पुरोगामी दिसला.
हिंदू मशिदीत जेवला, मुस्लिम मंदिरात जेवला, 
सर्व धर्मियांनी विहारात आसरा घेतला, श्रीमंत - गरीब एकाच जागी राहिला....

अनेक संकटे आली महाराष्ट्रावर... या महाराष्ट्राची मान कधी झुकू देणार नाही...
माणसं आहोत आम्ही, माणुसकी कधी मरू देणार नाही...
असेल वेगळी आमची जात, धर्म, पंथ, नेते व  विचारसरणी,
पण आज कळलं संकटाच्या वेळी कामी फक्त येते माणुसकी....

या महापुरातून महाराष्ट्र सावरेल याची मला खात्री आहे.
पण येथे जन्मलेल्या माणुसकीच्या संगोपनाची जबाबदारीही आपलीच आहे!!!

शपथ घेतो शिवरायाची,
शपथ घेतो महाराष्ट्राची,
शपथ घेतो फुले, शाहू, आंबेडकरांची...
शपथ घेतो महाराष्ट्र धर्माची,
शपथ घेतो भारतीयत्वाची,
आणि शपथ घेतो माणुसकीची...
माणूस आहे माणसासारखाच वागणार.
मानवधर्म जपणार, मानवधर्म वाढवणार....

असेल मी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, ख्रिश्चन, मराठा, बौद्ध, 
महार, मातंग, साळी, माळी, कोळी, आगरी, न्हावी, शिंपी, आदिवासी किंवा अजून काही....
पण मी प्रथम भारतीय आहे... आणि एक मानव आहे...
कारण मी पाहिलं आहे त्या  वर्दीतल्या देवांना...
जे कोणत्या जातीचे -  होते ते मलाही माहीत नाही.
मी पाहिलं आहे त्या माणसांना, जे रक्ताची नाती नसतानाही मदत करत होते
मी पाहिलं आहे त्या तरुणांना, जे आपल्या पूर्ण शक्तीने समाजकार्य करत होते 
मी पाहिलं आहे त्या माणसांना, जे देवापेक्षा मोठं काम करत होते.
माणुसकी ही ईश्वरसेवा, माणुसकी हा धर्म, माणुसकी हे परम कर्त्यव्य
माणुसकी ही राष्ट्रभक्ती, माणुसकी ही सेवा...

माणूस आहे माणसाप्रमाणेच वागणार,
स्वतःच्या बुद्धीचा आणि आत्म्याचा आवाज आता मीही ऐकणार...
माणुसकीसाठी, महाराष्ट्रासाठी, लोकशाहीसाठी ,स्वतःसाठी मला माझा योग्य राजा निवडायचा आहे!!!

आता नको मला दुष्काळ,
नको महापूर, 
नको बेरोजगारी,
नको जातीयवाद,
नको मुस्कटदाबी,
नको हिटलरशाही...

मला हवी लोकशाही...
मला हवं स्वराज्य,
मला हवी स्वच्छ हवा,पाणी,रस्ते,शिक्षण,आरोग्य,नोकरी
मला हवं संवेदनशील प्रशासन... आणि जाणता राजा!!!
 
यासाठी लढण्याची तयारी हवी,
एकाला दुसऱ्याची अन् दुसऱ्याला तिसऱ्याची साथ हवी.
यशस्वी होईल लोकशाही, नांदेल पुन्हा माणुसकी,
जेव्हा - जेव्हा आयुष्यात येईल प्रवास महापुरातला...
मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!



click for social media contacts:








Wednesday 7 August 2019

आपला मेंदू सांभाळा,जातीयवादी सक्रीय झाले आहेत....

दिनांक २१ जुलै  २०१९ रोजी मी माझ्या फेसबुक वाॅलवर लिहिलेली अभ्यासपूर्ण पोस्ट जागल्या या वेब पोर्टल ने स्वतःच्या फेसबुक वाॅलवर माझ्या परवानगीने शेयर केली. तीच पोस्ट आपल्या हक्काच्या ब्लॉगवर पुन्हा प्रकाशित करत आहे. आपण माझी पोस्ट www.jaaglya.com च्या अधिकृत फेसबुक पेजवरही पाहू शकतात. त्यासाठी इथे क्लिक करा.

#सावधान!!!
#ताबडतोब_हा_ग्रुप_सोडा.

आपला मेंदू सांभाळा,जातीयवादी सक्रीय झाले आहेत....

     आज सकाळी नेहमीप्रमाणे फेसबुक चाचपडत होतो. एका वर्ग मैत्रिणीने मला टॅग करत एक पोस्ट शेयर केली होती. त्यात एका फेसबुक ग्रुप मध्ये एका अकाऊंट वरून आक्षेपार्ह आणि भडकाऊ पोस्ट करण्यात आली होती. अर्थातच माझ्यासाठी ही काही नवीन बाब नव्हती. वेळेअभावी तेव्हा ती पोस्ट मला व्यवस्थित पाहता आली नाही. ती पोस्ट आत्ता बघितली आणि यावर लिहिणं गरजेचं वाटलं म्हणून लिहितोय.
तर आता त्या पोस्ट बद्दल सांगतो... 
   त्या पोस्ट मध्ये पूजा शिंदे नावाच्या एका फेसबुक अकाऊंट वरून एक चिथावणीखोर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात लिहिले आहे कि, - " मी सर्व हिंदूंना भीमट्याच्या ग्रुपमध्ये ऍड करत आहे... त्यांनी १०० हिंदूंना ऍड करावे ही विनंती.... चला आपणही दाखवत आपली पावर, hindu warriors" अशा प्रकारची हि पोस्ट होती. मित्रांनो ह्या अकाऊंट वरून अशा बऱ्याच पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील काहींचे स्क्रीन शॉट्स माझ्याकडे आहेत. अर्थात ते इतरांना सावध करण्यासाठी आणि पुरावा म्हणून काढून ठेवले आहेत. पूजा शिंदे हे फेसबुक अकाऊंट अभ्यासून समजले कि, हे एक १००% फेक अकाऊंट असून केवळ हिंदू, मुस्लिम,बौद्ध बांधवांमध्ये भांडणे लावण्यासाठी याचा उपयोग चलाखीने केला जात आहे. अनेक आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर आता हे अकाउंट अचानक गायब झाले आहे. त्यामुळे जातीय द्वेष पसरविणे हाच त्या समाजकंटकांच्या उद्देश होता हे समजण्यासाठी कुण्या विद्वानाची गरज नाही. त्यामुळे आता तथाकथित पूजा शिंदे च्या नावाने टीका टिपण्णी अथवा शिवीगाळ करून उगाच आपला वेळ वाया घालवू नका कारण मुळात अशी कोणतीही व्यक्ती नसून ते एक फेक फेसबुक प्रोफाईल आहे.
ह्या ग्रुप बद्दल माहिती आणि विश्लेषण ....
     SAPNA CHOUDHARY UNOFFICIAL या नावाने फेसबुकवर एक ग्रुप आहे ज्यात आत्तापर्यंत (म्हणजे दि. २० जुलै २०१९, सायंकाळी ०५:३० पर्यंत) एकूण ११,७३,१४३(अकरा लक्ष, त्र्याहत्तर हजार, एकशे त्रेचाळीस) सदस्य आहेत. (विवादास्पद पोस्ट नंतर आता ह्या ग्रुपमधून सदस्य बाहेर पडत आहेत.) ३ ऑगस्ट २०१३ रोजी हा ग्रुप एका वेगळ्या नावाने तयार करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये माझ्या फ्रेंडलिस्ट मधील सुमारे २७५ लोक आहेत. आत्तापर्यंत अनेकदा या ग्रुपचे नाव गरजेनुसार आणि ट्रेंड नुसार बदलण्यात आले असण्याची शक्यता आहे. या ग्रुपचे एकूण सहा ऍडमिन आणि एक moderator (नियंत्रक) आहे. सपना चौधरी ही आपल्या खास हरियाणवी नृत्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे तिचा चाहता वर्गही मोठा आहे. याचाच फायदा घेऊन अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने सोशल मीडियावर बरेच फेक अकाउंट्स मोठ्या प्रमाणात तयार केले जातात आणि त्याचा विविध प्रकारे स्वतःसाठी फायदा करून घेतला जातो. इथेही हाच प्रकार आहे. त्यामुळे अशा फेक अकाउंट्स आणि पेजवरून प्रसिद्ध केलेल्या मजकुराला किती आणि का महत्व द्यायचे? हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. कारण सोशल मीडिया सहज, सोपे आणि स्वस्त प्रसारमाध्यम असल्यामुळे समाजकंटकांकडून याचा सर्रासपणे वापर केला जातो. आता ह्याच ग्रुपमध्ये पहा जेवढे ऍडमिन आहेत त्यातील एकानेही आपली खरी आणि स्पष्ट ओळख न सांगता खोटे फोटोज् प्रोफाईल फोटो म्हणून ठेवले आहेत. सपना चौधरीच्या नावाने लाखो लोक या ग्रुपमध्ये सामील झाले. त्यात सर्व धर्म - जातीचे लोक आहेत, त्यामुळे काही समाजकंटकांनी याचाच फायदा घेत ग्रुप जॉईन केला आणि आक्षेपार्ह पोस्ट करत द्वेष पसरवत आहे.

त्या ग्रुपमधील काही स्क्रीनशॉट्स आपण पाहू शकता... कि जातीयवादी लोक समाजात कशाप्रकारे द्वेष पसरवत आहेत.


                                                       



१) ऍडमिन चे नाव : Sapna sharma (हे फेसबुक अकाऊंट आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/qayoom.qayoom.1088
२) ऍडमिन चे नाव : Umair Ali (पाकिस्तान,हे फेसबुक अकाऊंट आहे)
पेजचा URL पत्ता: https://www.facebook.com/IAMUMAIROFFICIAL
३) ऍडमिन चे नाव : Divyanka Singh (हे फेसबुक अकाऊंट आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/divyanakasingh32
४) ऍडमिन चे नाव : GROUP ISHAQ (हे फेसबुक पेज आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/GROUP-ISHAQ-1819605068062417/
५) ऍडमिन चे नाव : Funny videos (हे फेसबुक पेज आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/Funny-videos-2048461625455243/
६) ऍडमिन चे नाव : Jai Mata Di (हे फेसबुक पेज आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/jaimatadiofficialpage/
७) ऍडमिन चे नाव : मोहब्बत ही मोहब्बत (हा फेसबुकग्रुप आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/mohabbatheemohabbat/
८) नाव : Vishwa Ratna (हा फेसबुक पेजचा सर्वेसर्वा असण्याची शक्यता आहे)
पेजचा URL पत्ता : https://www.facebook.com/VishwaRatna
ह्या ग्रुपचा पूर्णपणे अभ्यास केला असता लक्षात आले कि हा ग्रुप समाजात जातीय द्वेष आणि दंगली पसरवणाऱ्या समाजकंटकांकडून चालविण्यात येत असून समाजात अशांतता आणि अराजकता पसरविणाऱ्या अज्ञात शक्तींचे हे एक षडयंत्र आहे. समाजात जातीय द्वेष आणि दंगली पसरविण्यासाठी खोटा मजकूर, फेक पोस्ट, फोटोशॉप, व्हिडिओ एडिटर यांचा वापर करून हे समाजकंटक आपलं उद्धिष्ट साधत आहे. मोठ - मोठ्या समाजसुधारकांवर आणि नेत्यांवर अगदी खालच्या पातळीतून हे लोक आपली ओळख लपवून अथवा खोटी ओळख सांगून टीका - टिपण्णी आणि चिखलफेक करत आहे.

आपण काय करावे?
१) सर्वप्रथम आपण आपल्या विवेकबुद्धीचा वापर करत पोस्ट खरी कि खोटी हे समजून घ्यावे. पोस्टची सत्यता तपासण्याचे अनेक मार्ग आहेत त्यासाठी सोशल मीडियाचा वापर योग्यरित्या करता येणे आवश्यक आहे. 
२) एखादी पोस्ट आक्षेपार्ह, जातीय आणि सामाजिक द्वेष पसरवणारी अथवा खोटी आहे असे लक्षात आल्यास त्या पोस्टला त्वरित रिपोर्ट करून ब्लॉक करावे आणि शक्य झाल्यास सायबर क्राईम शाखेत किंवा पोलिसात तक्रार द्यावी.
३) चुकीच्या आणि हिंसक अथवा जातीयवादी पोस्ट शेयर करू नये, आपण अशा पोस्ट शेयर करून नकळत समाजकंटकांना मदत करतो.
४) सोशल मीडिया हे सहज उपलब्ध होणारे स्वस्त पण प्रभावी माध्यम आहे त्यामुळे त्याचा वापर जपूनच करावा. आपण काय आणि का पोस्ट करतोय याची समज आपल्याला असावी. भावनेच्या अथवा रागाच्या भरात केलेली चिथावणीखोर पोस्ट समाजाला व आपल्यालाही नुकसानदायक ठरू शकते.
५)आपल्याला हिंसक, जातीयवादी, दहशत निर्माण करणाऱ्या पोस्ट आढळल्यास त्याचे स्क्रीनशॉट्स काढून आणि URL कॉपी करून ठेवावा जेणेकरून तक्रार देताना पुरावा म्हणून त्याचा उपयोग होईल.
६) अनेकदा आपल्या परिचयातील व्यक्तीसुद्धा नको त्या हिंसक किंवा जातीयवादी पोस्ट शेयर करत असतात, त्यांना याचे गांभीर्य सांगावे. असे अज्ञानी किंवा भावनिक लोक समाजकंटकांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात.
७) सोशल मीडियाचा वापर करत असताना आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती असणं आवश्य आहे नाहीतर चुकून अथवा आपली फसवणूक करून आपल्याच सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे युजरनेम आणि पासवर्ड सुरक्षित असावा.
८) आपण वापरत असलेल्या स्मार्टफोन किंवा संगणकाची काळजी घ्यावी. यात अँटीव्हायरस चांगल्या कंपनीचा असावा. तसेच वापरून झाल्यानंतर लॉग आउट करण्यास विसरु नये.
९) सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घ्यावी. आपण असे अनेक उदाहरणे पहिली आहेत कि ज्यात चुकीच्या अथवा भडकाऊ पोस्टमुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. सध्या मॉब लिंचिंग ही भारतातील मोठी समस्या बनली आहे. त्याला बऱ्यापैकी सोशल मीडिया देखील जबाबदार आहे.
१०) सर्वात महत्वाचं आहे कि अशा पोस्टवर रिऍक्ट न होणं!!! कारण आपण अशा पोस्टवर व्यक्त होऊन काहीही साध्य होत नाही. त्या पोस्ट शेयर करून आणि त्यावर कमेंट्स करून उलट त्यांनाच आपण नकळत प्रसिद्धी देत मदत करतो. त्यामुळे अशा बिनकामाच्या आणि भडकाऊ पोस्टवर व्यक्त होण्यात, वाद - विवाद करण्यात आपला वेळ वाया घालू नका त्यापेक्षा चांगल्या आणि अभ्यासू व्यक्तींच्या पोस्ट वाचत चला त्याचा नक्कीच फायदा आपणास होईल.

थोडंस मनातलं :
     प्रिय मित्र - मैत्रिणींनो आपण सगळे अनेक जाती -धर्माचे असलो तरी आपण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीयच आहोत हे विसरू नये. उगाच कोणतरी आपल्याला भडकवणार आणि आपण इकडे एकमेकांची डोकी फोडणार. याला कायअर्थ आहे? आपण आपला मेंदू गहाण ठेवलाय का? जे काहीही विचार न करता आपण एकमेकांच्या जीवावर उठतो. कधी कुण्या नेत्याच्या भाषणामुळे तर कधी अफवेमुळे, कधी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे तर कधी कट्टर धार्मिक विचारसरणीमुळे... अशा अनेक कारणांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन हत्या, दंगली होतात. ज्यात मारणारेही आपणच असतो आणि मरणारेही आपणच. फक्त त्याला एका धर्म किंवा जातीचं नाव देऊन समाजकंटक आपल्याला वेगळं करून आपल्यात भांडणं लावून गंमत बघत बसतात. मग आपण इकडे हिंदू विरुद्ध मुस्लीम, मराठा विरुद्ध बौद्ध, अमुक विरुद्ध तमुक या लफड्यात पडून आपलं नुकसान करून घेतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांनी आपलं आयुष्य वंचितांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी अर्पण केलं. राजश्री शाहू महाराजांनी वंचितांना आरक्षण देऊन त्यांची प्रगती केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिल. या सर्व महामानवांनी आपली जात आणि धर्म यापेक्षा आपली माती आणि आपली माणसं यांनाच जास्त महत्व दिलं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर आधारित संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. बाबासाहेब महात्मा फुलेंना आपले आदर्श मानायचे. बाबासाहेब आणि शाहू महाराजांची मैत्री तर जगाला माहित होती. या महामानवांनी कधीही एकमेकांची जात पहिली नाही, पाहिलं ते फक्त एक स्वप्नं... स्वत्रंत भारताचं.. समानतेच्या भारताचं... बंधुता आणि एकात्मतेच्या भारताचं.... पण आपण काय करतोय? आपल्या कृतीवरून आपण या महापुरुषांचे वारसदार शोभतो का? हा प्रश्न आपण स्वतःच स्वतःला विचारायला हवा.
विषय भरकटतोय ... पण काय करणार? सध्याची परिस्थिती पाहून असं वाटतं कि आपणच आपल्या महामानवांच्या विचारांची विटंबना करत आहोत. त्यासाठी मी माझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली. व्यक्त होणं गरजेचं आहे.
असो.... माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे कि या समाजकंटकांच्या जाळ्यात अडकून आपापसात भांडू नका. आपल्या मेंदूचा वापर इतरांना करून देऊ नका. प्रत्येक पोस्ट ही खरी आहे की खोटी हे अगोदर तपासा. महामानवांचे विचार त्यांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या कलेसाठी, आपल्या सत्कर्मासाठी, आपल्या लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी, आपला उद्योगधंदा वाढवण्यासाठी, शिक्षणासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त उपयोग करा हीच नम्र विनंती.
- तुमचा मित्र,अक्षय.

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...